इतर साहित्य

Back to List

भारताच्या स्वातंत्र्याची नांदी आणि मराठी संगीत रंगभूमीवरील नवयुगाची नांदी!

' चले जाव-लढेंगे या मरेंगे-भारत छोडो आंदोलन '

१९४२ साली ब्रिटिशांविरुद्ध अखेरचा स्वातंत्र्य लढा देण्याचे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी ठरविले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथील गोवालिया टँक मैदानावर (आताचे ऑगस्ट क्रांती मैदान) झालेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनात गांधीजींनी ब्रिटिश सत्तेला 'चले जाव'चा इशारा दिला. 'लढेंगे या मरेंगे'ची घोषणा झाली. त्यातून एक तेजाची ज्योती उठून साऱ्या देशभर पसरली. त्याच रात्री गांधींजींसह सर्व बड्या नेत्यांना अटक झाली.

' वंदे मातरम् गायन '

या काँग्रेसच्या ऐतिहासिक 'चले जाव' अधिवेशनात ८ ऑगस्ट रोजी वंदे मातरम् हे प्रेरणादायी, वंदनीय गीत संपूर्ण कडव्यांसहीत कट्टर देशभक्त असलेल्या कृष्णामास्तरांनी (मास्टर कृष्णराव/मास्तर कृष्णराव) मिश्र झिंझोटी रागातील स्वकृत चालीत गाऊन सादर केले.

'ऑगस्ट क्रांती'

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ९ ऑगस्ट १९४२ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीने (एआयसीसी) मुंबई अधिवेशनात 'भारत छोडो आंदोलन' सुरू केले होते. ऑगस्टमध्ये हे आंदोलन सुरू झाल्यामुळे ते 'ऑगस्ट क्रांती' म्हणून ओळखले जाते. ब्रिटिशांचे जुलमी राज्य संपवण्यासाठी हे देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले होते.

'संगीत कुलवधू'

ऐतिहासिक 'चले जाव' चळवळ ही भारतीय स्वातंत्र्याची नांदी होती आणि त्यात कृष्णामास्तरांना वंदे मातरम् गीत गाऊन सादर करायला मिळालं; तर ह्याच अधिवेशनामुळे ९ ऑगस्टला मुंबईत ऑपेरा हाऊसमध्ये ठरलेला 'संगीत कुलवधू' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पंधरा दिवसांनी पुढे ढकलण्यात आला. संगीत म्हणजे तर संगीत नाटकाचा आत्माच! मूकपटांचा जमाना होता तेव्हा मराठी संगीत रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. पण नंतर बोलपटांच्या झंझावतामुळे मराठी रंगभूमीला काहीशी मरगळच आली होती. कुलवधू नाटकाच्या नवतेचा स्पर्श लाभलेल्या संगीताने मराठी संगीत रंगभूमीला आलेली मरगळ झटकून टाकली; त्यामुळे ह्या नाटकाचे संगीत म्हणजे मराठी संगीत रंगभूमीवरील नवयुगाची नांदीच ठरली. शास्त्रीय संगीतावर आधारीत परंतु बदललेल्या काळाची पाऊले ओळखून कालानुरूप दिलेल्या भावगीत वळणाच्या चाली हे कुलवधूच्या संगीतातील सर्वांत मोठं वैशिष्ट्य होतं. गंधर्व नाटक मंडळीत रागदारीवर आधारित दर्जेदार चाली देणारे कृष्णामास्तर हेच कुलवधूचे संगीतकार होते. त्यांनी बदललेल्या काळानुसार स्वतःच्या नाट्यसंगीतात बदल घडवून त्यास भावगीताच्या वळणाने नटवले होते. शीघ्रतेने एका आठवड्यात प्रतिभावान मास्तरांनी या नाटकाला स्वतंत्र संगीत देऊन ती पदे कलाकारांकडून बसवून घेतली होती. २३ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत सकाळी संगीत कुलवधूचा ऑपेरा हाऊसला शुभारंभाचा प्रयोग झाला आणि त्याच दिवशी दुपारी परळच्या दामोदर हॉलमध्ये या नाटकाचा दुसरा प्रयोग झाला. एका सुंदर व अत्यंत सुश्राव्य नाटकाचा मराठी संगीत रंगभूमीवर जन्म झाला. 'बोला अमृत बोला' च्या अमृतस्वरांनी रंगदेवता प्रसन्न झाली आणि या नवीन वळणाच्या दर्जेदार नाट्यसंगीताने मराठी संगीत रंगभूमीला नवसंजीवनी प्राप्त झाली.

वंदे मातरम् ! जय हिंद!! जय भारत !!!

संवाद व संपर्क

अनुसरण करा